वाशिम,दि.९ जुन (जिमाका) कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर शेतकऱ्यांसाठी नवी संधी निर्माण करीत आहे. बदलते हवामान, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारपेठेतील चढउतार आणि कीड-रोगांच्या समस्यांमुळे शेती अधिक आव्हानात्मक बनत असताना अचूक व वेळेवर माहिती मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीविषयक इत्यंभूत माहिती सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने विकसित केलेले ‘महाविस्तार एआय’ अॅप प्रभावी डिजिटल माध्यम म्हणून पुढे येत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने कार्य करणारे हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे उपलब्ध करून देते. पीक लागवड, खत व्यवस्थापन, सिंचन, कीड व रोग नियंत्रण, हवामान बदलाशी संबंधित उपाययोजना, पशुसंवर्धन, कृषी योजना तसेच बाजारभाव यांसारख्या विविध विषयांवरील माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळू शकते.
विशेष म्हणजे, शेतकरी आपल्या स्थानिक भाषेत प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तांत्रिक माहिती समजून घेणे अधिक सोपे होते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अद्ययावत माहितीच्या आधारे हे अॅप शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
सध्या हवामानातील अनिश्चितता आणि एल निनोसारख्या परिस्थितीमुळे पीक नियोजनाचे महत्त्व वाढले आहे. अशा वेळी योग्य वाणांची निवड, पेरणीचा कालावधी, जलव्यवस्थापन, मृदसंधारण आणि कीड-रोग नियंत्रण यासंदर्भातील शिफारशी शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे आवश्यक असते. महाविस्तार एआय अॅप ही गरज प्रभावीपणे पूर्ण करत आहे.
कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान, प्रशिक्षण कार्यक्रम आणि तांत्रिक सल्ला यांची माहिती देखील या अॅपद्वारे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले आहे. माहितीच्या अभावामुळे होणारे नुकसान टाळून शास्त्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यामध्ये हे अॅप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
डिजिटल युगात माहिती हेच सर्वात प्रभावी साधन बनले असून, महाविस्तार एआय अॅप शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा विश्वासार्ह दुवा ठरत आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदणीमध्ये रिसोड तालुका १०,२४० नोंदणीसह आघाडीवर असून त्यापाठोपाठ मालेगाव ९,७३७, वाशिम ९,३८५, मंगरूळपीर ६,८९६, कारंजा ६,६८८ आणि मानोरा ४,१३४ शेतकऱ्यांनी अॅपवर नोंदणी केली आहे.अश्या एकुण ४७ हजार ८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
शेती अधिक उत्पादक, शाश्वत आणि हवामान बदलाशी सुसंगत करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने या अॅपवर नोंदणी करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
0 Comments