Ticker

6/recent/ticker-posts

६५० कि.मी. पायी वारी, सेवाभावी पत्रकारितेचा आदर्श; गजानन हरणे यांचा श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेकडून भावपूर्ण गौरव




पाच वर्षांपासून सातत्याने वारीचे वृत्तसंकलन; अध्यात्म, सेवा आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम

अकोला | प्रतिनिधी

श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते साक्षात विठुरायाच्या पंढरपूरपर्यंत निघालेली पवित्र वारी ही केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून श्रद्धा, समर्पण, सेवा आणि आत्मशुद्धीचा जीवनप्रवास मानला जातो. याच पवित्र वारीत खडकी (जि. अकोला) येथील ज्येष्ठ समाजसेवक, निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक तसेच वारकरी गजानन ओंकार हरणे यांनी तब्बल एक महिना पायी चालत ६५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सेवाभाव, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या व्हीआयपी सुविधा किंवा विशेष सोयी-सुविधांचा लाभ न घेता त्यांनी सामान्य वारकऱ्यांप्रमाणे संपूर्ण वारी पूर्ण केली. त्यांच्या या पदयात्रेतील प्रत्येक पाऊल समाजप्रबोधन, भक्ती आणि सेवाभावाने प्रेरित होते. वारीदरम्यान फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब तसेच विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी सातत्याने वृत्तसंकलन करून लाखो भाविकांपर्यंत वारीचे अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पोहोचविण्याचे कार्य निस्वार्थ भावनेने केले. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांनी सेवाभावी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला.

याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोट यांच्या वतीने अलीकडेच पार पडलेल्या वारी समारोप सोहळ्यात गजानन हरणे यांचा शाल, वस्त्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. हा सन्मान केवळ औपचारिक नसून त्यांच्या समर्पित सेवावृत्ती, अध्यात्मप्रेम आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष हभप वासुदेव महल्ले, उपाध्यक्ष माधव ठाकरे, सचिव रवींद्र वानखडे, सहसचिव अविनाश गावंडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, विश्वस्त गजानन दुधाळ, अनिल कोरपे, व्यवस्थापक हभप अंबादास मानकर, मोहनराव जायले पाटील, सुनंदाताई आमले, नंदकिशोर हिंगणकर, केशवप्रसाद राठी, दानशूर व्यक्तिमत्त्व चिकटे साहेब, हभप सागर महाराज परिहार, हभप विष्णु महाराज गावडे, हभप मोहकार महाराज, मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, आर्किटेक्ट अनंत गावंडे, चंद्रशेखर ठाकरे, राजू पुंडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वारकरी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना गजानन हरणे म्हणाले, "ही वारी माझ्यासाठी केवळ धार्मिक यात्रा नव्हती, तर समाजसेवा आणि आत्मअनुभूतीचा एक अमूल्य प्रवास ठरली. श्री विठ्ठलाच्या कृपेने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. हा सन्मान माझा नसून प्रत्येक वारकरी, समाजसेवक आणि माध्यम क्षेत्रातील सेवाभावी पत्रकारांचा आहे."

गेल्या पाच वर्षांपासून गजानन हरणे सातत्याने पायी वारी करत असून, वारीतील घडामोडींचे वृत्तसंकलन आणि समाजप्रबोधनाचे कार्य निस्वार्थ भावनेने करत आहेत. त्यांच्या कार्यातून अध्यात्म, समाजसेवा आणि पत्रकारिता या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात निष्ठा, समर्पण आणि सेवाभाव ही जीवनमूल्ये जपणारी व्यक्तिमत्त्वे दुर्मीळ होत चालली आहेत. अशा काळात गजानन हरणे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेने मूल्यांचा गौरव केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments