मुंबई, 30 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळाले. 'तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.
'शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांना दररोज वेगवेगळी विधानं करून अडचणीत आणत आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय आहे. सामना म्हणजे संजय राऊत, संजय राऊत म्हणजे सामना असं आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. त्यांच्या विधानाचा समाचार घेत राऊत म्हणाले की, 'तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे आणि माझी नियुक्तीही खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली आहे', असा टोला लगावला.
यावेळी पत्रकारांनी ऊर्मिला मातोंडकर या सेनेत प्रवेश करणार आहे का? असं विचारलं असता राऊत म्हणाले की, 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच होत्या. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल'.
'पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगाला आदर्श दाखवून दिला आहे. इतक्या शांततेने आंदोलन केल आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पोलीस बळाचा वापर केला. तो वापर चीनसाठी केला असता तर लडाखमध्ये चीन सैन्य घुसले नसते', असा टोलाही राऊत यांनी मोदी सरकारला लगावला.
'ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था या चीन सारख्या सीमेवर पाठवाव्याl. कारण त्या दुष्मनांना जेरीस आणतात, त्यांना विरोधकांविरोधात कसे काम करायचे हे चांगले माहिती आहे', असा टोलाही राऊत यांनी लगावला.
0 Comments