Ticker

6/recent/ticker-posts

एका टाचणीने केली तीन लाखांच्या वीजेची चोरी, पहा वीजचोरीचा नवा जुगाड...

औरंगाबादमधील या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत टाचणीचा वापर करून तीन लाख रुपयांची वीज चोरी करून महाविरतरणला चक्रावून टाकले.

औरंगाबाद: राज्यात वीज चोरीमुळे महावितरणचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. त्याचा भुर्दंड हा सर्वसामान्यांना बसतो. महावितरणकडून वीज चोरांवर कारवाई करताना वीज चोरांच्या अनेक आयडिया सापडतात. मात्र, औरंगाबादमध्ये लाखो रुपयांची चोरी करून महावितरणला शॉक दिलाय.

राज्यात महावितरणकडून वीज चोरांविरोधात धडक कारवाई सुरू असताना औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसीमधील एका चोरीने अधिकाऱ्यांनाही शॉक बसलाय. अधिकाऱ्यांच्या तपासणीत केवळ एका टाचणीने तीन लाख रुपयांच्या विजेची चोरी केल्याचं समोर आलंय. वीज चोरी रोखण्याचं एक मोठं आव्हान महावितरणसमोर असल्यानं कोट्यवधींचं नुकसान होतंय. वीज चोरट्यांना  रोखण्यासाठी महावितरण अनेक प्रयत्न करते. मात्र, वीज चोरी करणारे महाभाग हे महावितरणाच्या एक पाऊल पुढे असतात. औरंगाबादमधील या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत टाचणीचा वापर करून तीन लाख रुपयांची वीज चोरी करून महाविरतरणला चक्रावून टाकले.

चिकलठाणा एमआयडीसीमधील सिसोदिया इंडस्ट्रियल ईस्टेटमधील हिलाबी इंजीनियरिंग वर्क्समध्ये प्लास्टिक बॉटल तयार करण्यात येतात. या कंपनीत महावितरणचे अधिकारी वीजबिल वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची नजर कारखान्यातील वीज मीटरवर गेली. तेव्हा त्या मीटरचा डिस्प्ले बंद होता. कारखान्यात वीज सुरू असतांना डिस्प्ले कसा बंद आहे, हे पाहण्यासाठी दिवे मीटर जवळ जाताच त्यांना शॉक बसला. कारण मीटरचा स्क्रोल बटण एका छोट्या टाचणीने दाबून ठेवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे जोपर्यंत स्क्रोल बटण दबलेले असेल तोपर्यंत डिस्प्ले गायब होते आणि वीज वापराची मीटरमध्ये नोंद होत नाही.
कुणाला कळणारही नाही, अशा पद्धतीने वीज चोरीची ही भन्नाट आयडिया पाहून महावितरणचे अधिकारी हैराण झाले. त्यांनंतर मीटर तपासणीसाठी महावितरणच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्यात या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी झाल्याचं स्पष्ट झाले. याप्रकरणी औरंगाबादच्या सिडको एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मात्र, असे किती महाभाग आहेत, जे अशा पिन आणि काट्याने महावितरणला शॉक देतात, त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments