मंगरूळपीर, ता. ३० मे: शहरातील मुख्य महामार्गावरील प्रत्येक विद्युत खांबावर 'तिरंगा सिरीज' लावून सौंदर्यीकरणाचे मोठमोठे गोडवे गात उद्घाटनाचा सोहळा अवघ्या काही आठवड्यांपूर्वी झाला. मात्र, अल्पावधीतच या शोभेच्या लाईटिंग सिरीजने दम तोडला असून, काही खांबांवर दिवे झगमगतात, तर काही ठिकाणी अंधाराचेच साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लोकांच्या पैशातून करण्यात आलेल्या या खर्चीक उपक्रमाची अवस्था बघून 'हौशीने केला पती, त्याला फुटली रगत पिती' हे मराठी म्हणप्रसिद्धीला पात्र ठरते आहे. प्रशासनाने वाहवा मिळवण्यासाठी फक्त उद्घाटनापुरतेच काम केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काम कुणाचे — नगरपरिषद की ठेकेदार?
या कामाची जबाबदारी नेमकी कुणावर आहे, याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने ठेकेदाराला जबाबदारी सोपवली का, की ही थेट नगरपालिका प्रशासनाची तांत्रिक बेजबाबदारी आहे? या प्रश्नावर कुणीही उत्तर देण्यास तयार नाही. परिणामी जनतेत रोष निर्माण होत असून, पैशांची उधळपट्टी करणार्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
देखभाल गायब, सौंदर्यीकरण अधांतरी
महामार्ग हे शहराचे मुख्य दार मानले जाते. तेथे दिवसरात्र झगमगणारी 'तिरंगा सिरीज' असावी, असा उद्देश निश्चितच स्वागतार्ह होता. मात्र, देखभाल आणि गुणवत्ता याकडे दुर्लक्ष झाल्याने हे काम आता कुचकामी ठरले आहे. काही खांबांवरील दिवे सतत बंद असून, काहींच्या सिरीज अधेमधे लुकलुकतात — यामुळे सौंदर्यीकरण नव्हे तर विस्कळीततेचा अनुभव नागरिकांना येत आहे.
प्रशासनाचे मौन — जनतेचा धिक्कार
या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन मौन बाळगत आहे. ना कोणी तांत्रिक कारणे स्पष्ट करत आहे, ना दुरुस्तीची तयारी दिसते. परिणामी नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत की — "हे सगळं केवळ उद्घाटनापुरतंच होतं का?"
तिरंगा सिरीज लावली पण खांब ठप्प,
नगरपरिषद गप्प!
नागरिक संतप्त!
पैशांची थट्टा थांबवा
0 Comments