"माझ्या देवा ईडा पीडा टळू दे, माझ्या बळीचं राज्य येऊ दे!"
हे शब्द मी पहिल्यांदा वाचले, तेव्हा डोळ्यांसमोर एक थकलेला, मातीने भरलेला पण डोळ्यांत आशेचा प्रकाश असलेला बाप उभा राहिला. त्याच्या ओठांवर प्रार्थना आहे – पण गाऱ्हाणं नाही, आकांत नाही… आहे फक्त एक शब्दांमधून वाहणारी श्रद्धा.
सुधाकर चौधरी यांच्या कवितेतील प्रत्येक ओळ ही जणू मातीची वेल आहे — जी वेदनेतूनही फुलते, जी स्वप्नांच्या पाण्यावर पोसते.
"पडले जेव्हढे थिगळ आयुष्याला, त्याला शिवून घेऊ दे!" — ही ओळ वाचताना वाटतं, की आयुष्य जर फाटलेलं असेल, तरी त्याला जपून शिवण्याची एक आशा असावी. एक धागा आपल्या प्रेमाचा, दुसरा समजुतीचा, आणि तिसरा सहवेदनेचा.
माझे वडील, माझी आई, माझा भाऊ — हे शब्द मी लिहिताना, माझं ह्रदय भरून येतं.
माझे वडील सरकारी नोकरीतून रिटायर झाले, पेन्शन सुरू आहे, तरीही ते दररोज पहाटे उठून शेतात जातात. उन्हं असो, वारा असो, त्यांचा हात मातीपासून दूर जात नाही. हे कष्ट पैसेसाठी नाहीत — ते संस्कार आहेत, नातं आहे मातीशी.
माझी आई त्यांचं पाठबळ आहे. आणि भाऊ — तोही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकतोय.
या घरात बळी म्हणजे केवळ कवितेतील एक प्रतिक नाही; तो माझ्या घरात जगतो. तो दररोज आपल्या घामातून भविष्य घडवतो.
"ज्या दिवशी शेतकरी सुखी, त्याच दिवशी हे जग सुखी होईल" — हे वाक्य मी अनुभवते… प्रत्येक दिवसात, प्रत्येक थेंब घामात.
ही कविता मला विचार करायला लावते की, आपण त्यांना काय दिलं? केवळ आश्वासनं की सन्मान?
शेतकरी सुखी व्हावा यासाठी फक्त धोरणं नाही, तर संवेदना लागतात…
आणि ही संवेदना आपल्या घरातून, आपल्या माणसांतून सुरू होते.
आज बळीचा शब्द माझ्या वडिलांच्या हातात आहे.
आणि त्यांच्या डोळ्यांत पाहिलं, की मला वाटतं —
हो, बळीचं राज्य केवळ स्वप्न नाही…
ते माझ्या घरापासूनच सुरू झालं आहे.
0 Comments