Ticker

6/recent/ticker-posts

उपराजधानी नागपूरसह अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ मार्गांवरून रात्रीची एस.टी. सेवा सुरू करा – संजय कडोळे यांची आमदार सईताई डहाके यांच्याकडे मागणी


वाशिम (दि. २१ मे) : कारंजा (लाड) येथे आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात विविध प्रश्नांबरोबरच प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयींचाही प्रश्न ऐरणीवर आला. या दरबारात ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त समाजसेवक आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी एस.टी. महामंडळाच्या बससेवेबाबत महत्त्वपूर्ण मागणी सादर केली.

“कारंजा शहर हे अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या चारही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. न्यायालयीन, वैद्यकीय, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच खाजगी कामांसाठी येथून दररोज प्रवासी या शहरांमध्ये जात असतात. मात्र, सायंकाळी ८.३० नंतर परतीची कोणतीही बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो,” अशी व्यथा संजय कडोळे यांनी मांडली.

यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराने दररोज दुपारी वरील चारही जिल्ह्यांकडे बस सोडावी आणि संबंधित जिल्ह्यांतून रात्री ९.०० वाजता परतीस कारंजा दिशेने बससेवा सुरु करावी, अशी ठोस मागणी निवेदनाद्वारे केली.

तसेच, नागपूर उच्च न्यायालयाचे कामकाज, व्यावसायिक कारणे तसेच वैयक्तिक कामासाठी दररोज अनेक कारंजेकर नागपूरला जात असतात. पूर्वी चालू असलेली नागपूर–बुलडाणा रातराणी बस ही कारंजा मार्गे सुरू होती, परंतु सद्य:स्थितीत ही सेवा बंद झाल्यामुळे नागपूरहून रात्री परतीस येण्यासाठी प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सकाळी कारंजा–नागपूर व रात्री नागपूर–कारंजा अशी नियमित बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी कडोळे यांनी केली.

यासोबतच, भाविकांच्या सोयीसाठी कारंजा–पंढरपूर दरम्यानही एस.टी. सेवा सुरु करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या वेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य समीर देशपांडे, अमोल अघम, तसेच प्रवासी प्रतिनिधी सदानंद वानखडे उपस्थित होते. आमदार सईताई डहाके यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत शासन आणि एस.टी. महामंडळाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments