Ticker

6/recent/ticker-posts

वान धरणातील युवकाचा मृतदेह सापडला – पिंजरच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन पथकाची अतुलनीय कामगिरी


तेल्हारा (ता. ७ जून २०२५) – तेल्हारा तालुक्यातील वारी (हनुमान सागर) येथील वान धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता सापडला. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढत आपल्या निष्ठेची आणि सेवाभावाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जितेंद्र मनमोहन राठी (वय ३० वर्षे, रा. दानापूर, ता. तेल्हारा) हा युवक वान धरणाजवळील भिंतीवर मोटारसायकल लावून गायब असल्याचे दृश्य आज दुपारी आढळले. धरणाजवळ त्याच्या चप्पल पाण्यावर तरंगताना आढळल्या होत्या. यावरून त्याच्या बुडाल्याचा संशय बळावला. ही माहिती मिळताच अकोला जिल्ह्याचे खासदार अनुपभाऊ धोत्रे व तहसीलदार सोनावणे सर यांनी तातडीने शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

स्थानीय पातळीवर दोन टीम्सनी शोधमोहीम सुरु केली. मात्र नेमकं बुडाल्याचं ठिकाण माहीत नसल्याने त्यांना यश मिळालं नाही. अखेर, पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहिती देण्यात आली. त्यावेळी सदाफळे यांची टीम आधीच बोरमळी धरणात बुडालेल्या दोन युवकांचा मृतदेह शोधण्यात व्यस्त होती. तरीही, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशावरून व आरडीसी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदाफळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहिमेसाठी रवाना होण्याचा निर्णय घेतला.

टीमचे सदस्य:

  • दिपक सदाफळे (पथक प्रमुख)
  • मयूर सळेदार
  • शेखर केवट
  • अंकुश सदाफळे
  • विष्णू केवट
  • किशोर तायडे
  • शिवम वानखडे
  • सार्थक वानखडे

सर्व सदस्य आवश्यक शोध साहित्यसह रात्री ८ वाजता घटनास्थळी दाखल झाले. धरणातील पाण्याची खोली काही ठिकाणी ७० ते ८० फूट असल्याने आणि दगडधोंड्यांच्या कपारीमुळे अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, पथकाने मृतदेह सापडेपर्यंत सर्च ऑपरेशन न थांबवण्याचा निर्धार केला.

शेवटी, रात्री ११:३० वाजता, पाण्याच्या अंदाजे ८० फूट खोल भागात रॅम्प यु किटच्या सहाय्याने मृतदेह सापडला व बाहेर काढण्यात आला. या वेळी हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन राठोड, पो.काॅ. प्रमोद चव्हाण, पो.हे.काॅ. इंगळे, तसेच तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी ओमप्रकाश वेरुळकर, तलाठी अंकुश मानकर, दानापूरचे पो.पा. संतोष माकोडे, तसेच मृत युवकाचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. तहसीलदार सोनावणे सर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्याशीही पथक संपर्कात होते.

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे हे कार्य अतिशय उल्लेखनीय असून, त्यांच्या जिवावर उदार होऊन केलेल्या कार्यामुळे एका कुटुंबाला closure मिळालं आहे.


Post a Comment

0 Comments