– जन्मदातेच नव्हे, तर घडवणारे देवतेसमान मार्गदर्शक
आपल्या आयुष्यात अनेक नाती येतात-जातात. काही वेळेसाठी असतात, काही कायमच्या आठवणी ठेवून जातात. पण एक नातं मात्र प्रत्येकाच्या जीवनात अढळ स्थान मिळवून असतं — आई-वडीलांचं. ही नाती केवळ जन्मापुरती मर्यादित नसून, ती आपल्या जडणघडणीत, संस्कारात, आणि जीवनमूल्यांत खोलवर रुजलेली असतात.
आई-वडील म्हणजे आपल्याला केवळ या जगात आणणारे नव्हेत, तर या जगात योग्य प्रकारे वावरण्यास शिकवणारे शिक्षक, समजूतदार मित्र, कठीण प्रसंगी खंबीर आधार आणि कोणत्याही परिस्थितीत न थकणारे समर्थक असतात.
बालपणात पहिली पावलं चालवताना मदतीचा हात देणारे, शालेय जीवनात यशापयशात साथ देणारे, तरुण वयात योग्य मार्ग दाखवणारे, आणि आयुष्यभर आपल्या मागे उभं राहून “मी आहे तुझ्यासोबत” असं नि:शब्द सांगणारे आईवडील हेच खरे आपल्या आयुष्याचे खरे मार्गदर्शक असतात.
प्रत्येक यशामागे त्यांचा त्याग असतो. प्रत्येक हसऱ्या क्षणामागे त्यांचं मूक सहनशील योगदान असतं. आपल्या चुकांवर रागावले तरीही त्यांच्या रागामध्येही माया दडलेली असते. ते थकतात, पण थकलेलं दाखवत नाहीत; ते दुःखी होतात, पण आपल्यासाठी हसणं सोडत नाहीत.
आज अनेक घरांमध्ये मुलं मोठी होतात, शिकतात, नोकरी करतात, जगतात… पण काही वेळा हेच मुलं त्यांच्या आईवडिलांना विसरतात. त्यांच्या उपस्थितीचं महत्त्व जेव्हा कमी भासू लागतं, तेव्हा आयुष्यातील खरी “शून्यता” हळूहळू जाणवू लागते.
कारण – “जगात सगळं मिळू शकतं, पण आईवडीलांचं स्थान दुसरं कुणीही घेऊ शकत नाही.”
आपल्या आयुष्यात त्यांच्या असण्याचा, प्रेमाचा, मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा जितका अधिक सन्मान करता येईल, तितकं आपलं जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होतं.
शेवटी एवढंच म्हणता येईल –
आईवडिलांची सेवा म्हणजे केवळ कर्तव्य नाही, ती आपली जबाबदारी आणि ऋण आहे.
ही जबाबदारी टाळणाऱ्या अवलादीचे भवितव्य हे दुःख, पश्चात्ताप आणि एकटेपणाने व्यापलेलेच असते.
जगात कितीही मोठं झालो, तरी जिथून आपण आलो त्यांचं ऋण मान्य न करणारा माणूस खऱ्या अर्थाने “मोठा” ठरत नाही.
"आई-वडील म्हणजे केवळ जन्मदाते नव्हेत, तर जीवनाला अर्थ देणारे देवतुल्य आधारस्तंभ असतात."
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments