मंगरूळपीर (प्रतिनिधी) :
गत दोन दिवसांच्या मुसळधार व अवकाळी पावसाने मंगरूळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. उभ्या पिकांसह शेतजमीन वाहून गेली, गुरेढोरे मृत्युमुखी पडली, तर गोरगरीब शेतमजुरांच्या झोपड्यांत पाणी घुसून संसार उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्यांचा श्वास घुसमटून जाईल अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना, आमदार शामभाऊ खोडे यांनी थेट प्रशासनाला धडक मारत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांना धीर देत आमदार खोडे म्हणाले –
“शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात मी व शासन ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. भरपाईसाठी कुठलाही विलंब सहन केला जाणार नाही. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे; त्याला वंचित ठेवले जाणार नाही.”
याचबरोबर त्यांनी शेतकरी बांधवांना धीर देत आवाहन केले की,
“नैसर्गिक आपत्तीसमोर हात छोटे पडले तरी आत्मविश्वासानेच संकटावर मात करता येते. घाबरून न जाता आपण ही लढाई एकजुटीने लढू; शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी सर्वजण तुमच्या मदतीसाठी सज्ज आहेत.”
आमदार खोडे यांच्या या आश्वासनाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, पंचनाम्यांचा अहवाल थेट शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
उभ्या पिकासह सेत खरडून गेले
0 Comments