Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमंतीचा साज हवा; संपत्तीचा माज नको…


जीवन सुंदर आणि समृद्ध असावे—याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. माणसाने प्रगती करावी, सुखसोयी मिळवाव्यात, यशस्वी व्हावे; पण प्रश्न असा आहे की ही प्रगती माणूस म्हणून उंचावते की अहंकाराने फुगवते?

आज समस्या श्रीमंतीची नाही,
समस्या आहे श्रीमंतीसोबत येणाऱ्या माजाची.

आपण सृष्टीचे मालक नाही, तर पाहुणे आहोत—ही साधी गोष्ट विसरली की माणूस स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजू लागतो. पाय जमिनीवर न राहता तो संपत्तीच्या शिडीवर चढतो आणि खाली पाहणं शिकतो. पैसा, पद, प्रतिष्ठा मिळाली की अनेकांना माणसं दिसेनाशी होतात; फक्त “आपण” आणि “आपलं” एवढंच उरतं.

सत्य अगदी स्पष्ट आहे—
या जगात आपण आलो रिकाम्या हाताने,
आणि जाणारही रिकाम्या हातानेच.

मरणानंतर श्रीमंताची राख वेगळी नसते,
गरीबाची माती वेगळी नसते.
चितेवर सगळे समान होतात—
पैसा, पद, प्रतिष्ठा, अहंकार… सगळेच जळून जातात.

तरीही माणसाची पत थांबत नाही.
हाव वाढते.
लोभ वाढतो.
माज वाढतो.

दुसऱ्याच्या दुःखावर उभे राहिलेले सुखही आपल्याला खटकत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. “आपण सुखी आहोत, बाकी काही महत्त्वाचं नाही” ही मानसिकता समाजाला आतून पोखरत आहे. म्हणूनच आज संपत्ती वाढतेय, पण समाधान कमी होत चाललं आहे.

खरा प्रश्न असा आहे—
आपण श्रीमंत होत आहोत की संवेदनाशून्य?
आपल्या घरात ऐश्वर्य वाढतंय, पण मनात माणुसकी उरतेय का?

खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच—
• ज्याच्याकडे पैसा असतो, पण नम्रता सुटत नाही.
• ज्याच्याकडे सत्ता असते, पण संयम असतो.
• ज्याच्याकडे प्रतिष्ठा असते, पण संवेदना जिवंत असतात.

श्रीमंतीचा साज नक्की हवा,
पण संपत्तीचा माज नको.

कारण शेवटी,
ही सृष्टी कुणाचीच नाही—
आणि आपण सगळेच इथे
थोड्या वेळाचे पाहुणे आहोत…!

– सुधाकर चौधरी , संपादक


Post a Comment

0 Comments