Ticker

6/recent/ticker-posts

चौकशीसाठी आधीच वेळ देऊनही वेळेत न पोहोचल्याबद्दल एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अभिनेत्री अनन्या पांडे हिला फटकारल्याचं समोर आलं आहे.




मुंबई: ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून अभिनेत्री अनन्या पांडे  हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) समन्स बजावलं होतं. त्यानुसार, शुक्रवारी अनन्या पांडे ही चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली. मात्र, तिला चौकशीला पोहोचण्यास उशीर झाल्यामुळं एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तिची खरडपट्टी काढल्याचं कळतं.

कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरील कारवाई दरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला अटक झाली आहे. अटक झाल्यापासून ३ ऑक्टोबरपासून तो कोठडीत आहे. एनडीपीएस कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर आता त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी सुरूच आहे. आर्यन खानच्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती लागला आहे. त्यात अनन्या पांडे हिचंही नाव आहे. आर्यन खान अनन्याच्या संपर्कात होता, असं या चॅटमधून समोर आलं आहे. एनसीबीनं हा चॅट कोर्टापुढं देखील सादर केला आहे.
अनन्याचं नाव समोर आल्यानंतर लगेचच गुरुवारी एनसीबीनं अनन्या पांडे हिला चौकशीसाठी समन्स बजावलं. गुरुवारी तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बोलावण्यात आलं होतं. मात्र, ती तीन तास उशिरानं म्हणजे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. त्यामुळं समीर वानखेडे संतापले. त्यांनी अनन्याला खडे बोल सुनावले हे तुझं प्रॉडक्शन हाउस नाही. केंद्रीय तपास संस्थेचं कार्यालय आहे. यापुढं चौकशीला बोलावल्यास वेळेवर हजर राहावं लागेल,' असं वानखेडे यांनी अनन्या पांडेला बजावल्याचं सूत्रांकडून समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात अनन्या आरोपी नाही, केवळ साक्ष नोंदवण्यासाठी तिला बोलावण्यात आलं होतं. अनन्याचा मोबाइल व लॅपटॉप एनसीबीनं जप्त केल्याचं समजतं. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यावर यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Post a Comment

0 Comments