महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून राज्यात सतत मोठमोठ्या घडामोडी घडत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना भाजपाची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत वेगळा गट स्थापन केला. तसेच थेट शिवसेना पक्षावर दावा केला. पक्षातील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भारतीय जनता पार्टीबरोबर राज्यात सरकार स्थापन केलं.
शिवसेनेतील बंडखोरीला एक वर्ष होत नाही तोवर राज्यात आणखी एक मोठा भूकंप झाला. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी राष्ट्रवादीमधील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत वेगळा गट बनवला आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर दावा केला. शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपाचं बहुमतातलं सरकार राज्यात अस्तित्वात असूनही अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. या घटनांवरून सातत्याने भारतीय जनता पार्टीवर टीका होत आहे. भारतीय जनता पार्टी इतर पक्ष फोडते, आमदार फोडते असा आरोप विरोधकांकडून होत आहे. राज्यातल्या या राजकीय परिस्थितीवर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
0 Comments