वाशीम (सुधाकर चौधरी) : “छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या जीवनाचा श्वास आहेत. त्यांचे विचार, त्यांची शिकवण हीच माझ्या सार्वजनिक जीवनाची दिशा आहे. महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून ते माझ्यासाठी श्रद्धास्थान आहेत,” अशा भावनात्मक शब्दांत आमदार श्याम खोडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वाशीम शहरात नुकतीच ‘ऑपरेशन सिंदूर’ या उपक्रमाच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी सैनिक, एनसीसी कॅडेट्स, भाजपा पदाधिकारी व विविध देशभक्त नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. रॅलीपूर्वी शहरातील चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याच वेळी एक छोटासा गोंधळ निर्माण झाला. याबाबत स्पष्टीकरण देताना आमदार खोडे म्हणाले, “हार अर्पण केल्यानंतर मी चौकातून खाली उतरलो आणि रॅलीसाठी बूट परिधान केले. त्याचवेळी मला पुन्हा पुतळ्याजवळ बोलावण्यात आलं. घाईगडबडीत मी पुन्हा बूट घालूनच पुतळ्याजवळ गेलो, आणि तेव्हाच मला लक्षात आलं की पायातील बूट काढणे विसरलो.”
“ही एक चूक होती, परंतु ती अनावधानाने झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता आणि नसेल. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या कृतीची जबाबदारी स्वीकारत आमदार श्याम खोडे यांनी दिलेलं हे निवेदन राजकीय प्रामाणिकपणाचं उदाहरण ठरत आहे. शिवप्रेम, नम्रता आणि आत्मपरीक्षणाची ही भावना जनतेच्या मनाला भिडणारी ठरली आहे.
0 Comments