Ticker

6/recent/ticker-posts

🚨 कारंजा शहरात दूषित पाणीपुरवठा – नागरिकांचा आक्रोश उसळला 🚨


एआयएमआयएमकडून निवेदन; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तातडीने कारवाईची मागणी

कारंजा (प्रतिनिधी)
"जीवनासाठी पाणी, आणि पाण्यासाठी जीवन" म्हणत गावकुसातील माताभगिनीपासून लेकरापर्यंत प्रत्येकजण थेंबथेंब पाण्यासाठी हतबल झाला आहे. कारंजा शहरातील अनेक भागांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून इतका दूषित झाला आहे की, नळातून येणाऱ्या पाण्याचा रंग, वास, आणि चवच नागरिकांच्या आरोग्यासाठी थेट धोकादायक ठरत आहे.

गावोगावच्या विहिरींचा गाळ, रस्त्याच्या नाल्यातून येणारी दुर्गंधी, आणि वरतून मिळणाऱ्या पाण्यातला कीडकीत वास – या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पोटदुखी, पिवळा ताप, आणि संसर्गजन्य रोगांचा धोका दार ठोठावत आहे.

या गंभीर परिस्थितीविरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) तर्फे, प्रदेश उपाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्ट शब्दांत नमूद –
"पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत अधिकार आहे; मात्र दूषित पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ!"

निवेदनात पुढे म्हटले आहे – सध्या मिळणाऱ्या पाण्यात गाळ, दुर्गंधी आणि अपायकारक घटक असल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने त्वरित पाणी शुद्धीकरणाची योग्य व्यवस्था करून दररोज तपासलेले, शुद्ध पाणी द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना नगरसेवक इर्शाद अली, यूनुस पहेलवान, अ. रशीद, सलीम गारवे, काजी-ए-शहर जाकिर शेख, निसार खान, अलिमोद्दीन पिंटया भाई, नदीम राज, रहेमान नंदावाले, रज्जाक खेतीवाले, कय्यूम जट्टावाले, रमजान शेकुवाले, शकील नौरंगाबादी, उस्मान खान, अकील पहलवान, मो. वकील, जुम्मा भाई, तस्लीम रेघीवाले, आकिब चौधरी, फारूक अली, मुन्ना ठेकेदार, अ. वहीद शेख, पत्रकार साजिद शेख, आकिब जावेद, चांदभाई मुन्नीवाले, मोहसिन शेख, यूसुफ खान मौलाना, मुजाहिद खान, मो. शारिक शेख, हाफिज खान, मोहज्जन खान, अ. करीम, शाहिद नौरंगाबादी, रोशन बेनीवाले, सलीम परसुवाले, शोहेब शेख, शाइक अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शहरातील रस्त्यांवर, चावड्यांवर, आणि नळांजवळ नागरिक एकच सवाल विचारताना दिसत होते –
"अरे, पाण्याशिवाय कसं जगायचं? आणि दूषित पाण्याने किती दिवस जगायचं?"
आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तातडीने कारवाई करते का, की नागरिकांचा आक्रोश अजून वाढतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.



Post a Comment

0 Comments