वाशिम | प्रतिनिधी | दि. ४ जानेवारी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अत्यावश्यक असून प्रत्येक ग्रामस्थाला या अभियानाची माहिती मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी केले.
कारंजा तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील, गटविकास अधिकारी पुनम राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी घुगे, बाळकृष्ण अवगण, श्री. साखरे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे समाजशास्त्रज्ञ रविचंद्र पडघान यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुकळी गावाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल समाधान व्यक्त करत, अभियानात यशस्वी होण्यासाठी करावयाच्या तयारीची सविस्तर माहिती कोवे यांनी दिली.
कोणतेही अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती हा मुख्य आधार असल्याचे नमूद करत त्यांनी गावातील चौकाचौकात बॅनर लावणे, अभियानातील उपक्रमांची माहिती देणे, दररोज सकाळी दवंडी देणे, शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे, तसेच बचत गटातील महिला व भजनी मंडळांच्या सभांमध्ये अभियानावर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. अभियानातील उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग व लोकसभा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुकळी गावातील स्वच्छता व्यवस्था व आजी-आजोबांसाठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कची पाहणी करून कोवे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सुरू असलेल्या घरकुल योजनांच्या कामांची पाहणी, बचत गटातील महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सार्वजनिक सांडपाणी एकत्र येणाऱ्या ठिकाणी परसबाग विकसित करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित सरपंच सविता सुनील वानखडे व ग्रामपंचायत अधिकारी नरेश गजभिये यांनी मिळालेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील व गटविकास अधिकारी पुनम राणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
0 Comments