नाशिक : काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी आणि ईडी चे धाडसत्र सुरू आहे. या धाडीच्या दरम्यान मोठं मोठे मासे गळाला लागले आहेत. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात मागील ५ दिवसात आयकर विभागाने तब्बल ३१ ठिकाणी छापेमारी केली आहे. नाशिक, धुळे नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ६ कोटींची रोकड, ५ कोटींचे दागिन्यांचाही समावेश आहे. इतकी अफाट संपत्ती जमवली कशी आणि आतापर्यंत याकडे कुणाचे देखील लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीमध्ये जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधींचे घबाड मोजण्याकरिता तब्बल १२ तास लागले आहेत. छाप्यामध्ये सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी २२ गाड्यांमधून १७५ अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले होते. त्यांच्याबरोबर तगडा पोलीस बंदोबस्त देखील होता.
0 Comments