Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक भान जपत पंचबुधे कुटुंबियांनी केला आगळा-वेगळा विवाह सोहळा!


१०१ वृक्ष लागवड आणि अभ्यासिकेला पुस्तके भेट देत आर्य समाज मंदिर, अमरावती येथे पर्यावरणपूरक विवाह

अमरावती, दि. २४ मे २०२५ — वाशिम जिल्ह्यातील पंचबुधे कुटुंबियांनी सामाजिक जाणीवेचा आदर्श ठेवत एक अनोखा विवाह सोहळा पार पाडला. श्री. जयरामजी पंचबुधे (निवृत्त ASI, महाराष्ट्र पोलीस) यांच्या सामाजिक विचारधारेतून प्रेरित होत, त्यांचे सुपुत्र चि. राहुल ज. पंचबुधे (सुरक्षा अधिकारी व प्रभारी अतिक्रमण अधिकारी, म.न.पा. चंद्रपूर) यांचा विवाह श्री. मारोतराव लुटे (कामरगाव) यांची कन्या चि.सौ. प्रिया मा. लुटे यांच्याशी आर्य समाज मंदिर, अमरावती येथे अत्यंत साधेपणाने पार पडला.

या विवाह सोहळ्याचे विशेषत्व म्हणजे कोणतीही फाजील दिखावा, डीजे, घोडा-बँड किंवा ध्वनीप्रदूषण न करता, आनंदमय व शांत वातावरणात विवाह विधी पार पडले. या नवदांपत्याने विवाहानंतर तब्बल १०१ वृक्ष लावण्याचा संकल्प करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्यात आली.

पंचबुधे व लुटे कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून, हा विवाह सोहळा सामाजिक बांधिलकी जपणारा व पर्यावरणपूरक उपक्रम ठरला आहे.

— सुधाकर चौधरी 

वाशिम खबर आवाज 

महाराष्ट्राचे संपादक 




Post a Comment

0 Comments