Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ६८ शब्दांत?" – सीबीएसईच्या राष्ट्रद्रोही दुर्लक्षावर सवालांची वज्रघातक तलवार !


"ज्यांच्या तलवारीने औरंगजेबाला झुकवलं, त्यांच्या चरित्रासाठी फक्त अकरा ओळी?"

 वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचेसं पादक सुधाकर चौधरी 

छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा मूळ स्तंभ, रयतेचा राजा, स्वराज्याचे जनक आणि हिंदवी स्वराज्याचा पुरोगामी शिल्पकार. जगाच्या इतिहासात जिथे कुठे अन्यायाविरुद्ध बंड उभारलं गेलं, तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली जाते. पण दुर्दैव पाहा – भारतातीलच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या २२०० पानांच्या इतिहास अभ्यासक्रमात महाराजांविषयी केवळ ६८ शब्दांचा उल्लेख!

हा अपमान नाही तर दुसरं काय?

देशाच्या इतिहासावर गाढ प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी धक्कादायक बाब समोर आली आहे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास केवळ 68 शब्दांत उरकण्यात आला आहे! महाराष्ट्राच्या मातीचा, स्वराज्याचा, स्वाभिमानाचा आणि शौर्याचा अध्वर्यू असलेल्या शिवछत्रपतींविषयी इतका अल्प व निरुत्साही उल्लेख देशपातळीवरील अभ्यासक्रमात करणे हे केवळ अन्यायकारकच नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक दारिद्र्याचं द्योतक आहे.

सीबीएसईच्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा वाशिम खबर आवाज आणि दैनिक पुढारीने संयुक्तपणे सखोल अभ्यास केला. सुमारे 2,200 पानांच्या अभ्यासक्रमात मराठ्यांचा इतिहास केवळ दोन पानांपुरता मर्यादित आहे, आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फक्त 11 ओळींचा, 68 शब्दांचा कोरडा उल्लेख करण्यात आला आहे.

"द मराठाज् - मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली (1630.) मुघल सत्तेला विरोध करणारी मराठा राजवट आणखी एक शक्तिमान प्रादेशिक राजवट ठरली. शक्तिशाली लढवय्या देशमुखांच्या आणि चपळ कुणब्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी (1630-1680) स्थिर राजवट दिली. या शक्तीच्या जोरावर त्यांनी मुघलांना आव्हान दिले."

हा उल्लेख न केवळ अपुरा आहे, तर इतिहासाच्या आत्म्याशी बेईमानी करणारा आहे. कोणतीही सांस्कृतिक पार्श्वभूमी, राज्याभिषेक, स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, रयतेचा राजा ही संकल्पना, अष्टप्रधान मंडळ, नौदल उभारणी यासारख्या अद्वितीय योगदानाचा कुठेही उल्लेख नाही. यातून काय संदेश दिला जातो? शिवाजी महाराजांचा इतिहास "प्रादेशिक" म्हणून डावलणे हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा अपमान नाही का?

ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणतात, "शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात स्वीकारणं हे केवळ गरज नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. इतिहास म्हणजे केवळ कालक्रम नव्हे, तर मूल्यांची, आत्मसन्मानाची आणि प्रेरणेची शिदोरी. 68 शब्दांत शिवचरित्र बंदिस्त करणे म्हणजे भावी पिढ्यांपासून उज्ज्वल वारसा हिरावून घेणे."

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात त्या दिशेने कोणतेही ठोस पाऊल दिसून येत नाही. उलट, विद्यमान अभ्यासक्रमात मराठा इतिहासाची झालेली गळचेपी ही तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.

संपादक सुधाकर चौधरी यांचा स्पष्ट इशारा – "आज जर आपण डोळे उघडे ठेवून हा अन्याय थांबवला नाही, तर उद्याची पिढी आपल्याच मुळांपासून तुटलेली असेल. सरकार, इतिहासकार आणि पालकांनी आता सजग होण्याची वेळ आली आहे."

आवाहन – आता तरी जागे व्हा!

शिवाजी महाराज हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर अखंड भारताचा आदर्श आहे. त्यांचं योगदान शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर अगदी सविस्तर आणि प्रेरणादायी पद्धतीने शिकवलं जावं, हीच खरी राष्ट्रभक्ती ठरेल. अन्यथा, आपली भावी पिढी केवळ परकीयांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला अपुरा इतिहास वाचत मोठी होईल – आणि तेव्हा आपल्याला पश्चात्ताप करूनही उशीर झालेला असेल.

Post a Comment

0 Comments